ज्यादिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो तेव्हा ती रात्र अमावास्येची असते. आपण पाहूया दर्श अमावास्या म्हणजे काय.. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दिपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते. पूर्वीच्या काळापासून अंधारात आधार देणा-या पणतीपासून ते लामणदिवा, कंदील व सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जाते.
“अनेकजण ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. कारण श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, दारू व इतर अनेक मांसाहारी पदार्थांचे सेवन करीत नाहीत. त्यामुळे हल्लीच्या काळात या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.”
ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. त्यामुळे यावर्षीची गटारी अमावास्या सोमवारी येण्याचा योग आला आहे, जो फार कमी असतो. म्हणून यावर्षी दर्श सोमवती अमावास्या आहे.
या अमावास्येला पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
“दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥ म्हणजेच “हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस.तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस.माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर”
श्रावण महिन्यात मांस-मच्छी का खात नाहीत?
आपल्या भारतीय ऋतुचक्राप्रमाणे श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याची सुरुवात व या दरम्यान ऋतूबद्दल होत असतं. त्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे धार्मिक कारणामुळेच का नसो पण हे आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा बंधने पाळण्यात आली असावीत. तसेच श्रावण महिन्यात उपवास असल्याने बरेच लोक मांसाहार व दाढी-केस कापत नाहीत. मुख्यतः हा काळ माशांच्या प्रजननासाठी महत्त्वाचा असतो.
“या दिवशी दिव्याचे पूजन करून जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी प्रार्थना करून आपण अमावास्या साजरी करायची कि खाऊन- पिऊन गटारात लोळून हे आपल्यावर अवलंबून आहे.”