हल्लीच ३ जूनला निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले होते तसेच अलीकडेच महाडला व भिवंडीमध्ये इमारत दुर्घटना घडली. परंतु बचावकार्य करायला एक दल तातडीने हजर झाले आणि बचावकार्य पूर्ण करून अनेकांचे जीवही वाचवले. ते म्हणजे NDRF (National Disaster Response Force).

आपल्या देशात, राज्यात भूकंप, पूर, दरड कोसळणे अशा अनेक घटना घडत असतात. अशा आपत्तींना तोंड देण्याच्या उद्देशाने NDRF ची स्थापना करण्यात आली.
NDRF ची स्थापना कशी झाली?

१९ वे शतक संपून २००० शतक चालू झालं होतं त्यामुळे सर्वानी दणक्यात स्वागत केले. परंतु वर्ष लोटले नाही तर प्रजासत्ताक दिनीच २६ जानेवारी २००१ साली ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने गुजरात हादरले. अब्जो रुपयांची हानी, १५ हजारांहून अधिक मृत्यू आणि अनेक घरे-इमारती जमीनदोस्त झाली. अपुरी मदत आणि आपत्ती निवारण समितीचे अपयश दिसून येत होते.
मदत करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या टीम उपलब्ध झालेल्या परंतु समन्वयाचा अभाव आणि गुजरात सरकारच्या योजनांच्या कार्यक्षमतेवरती देशभरातून सवाल केले जाऊ लागले. या भूकंपामुळेच खरं तर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदावर आले.
विविध काही ना काही आपत्ती भारतात होतच होत्या त्यामुळे भारताचे त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ठरवले कि अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
त्यावेळेस आपत्ती निवारण व्यवस्था म्हणजे फक्त भूकंप आणि पूर याबाबतीतच सीमित होती परंतु सर्वच बाबींचा विचार करणे गरजेचे होते. या अनुषंगाने पंतप्रधानांनी सर्वच पक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरवले.
शरद पवार नुकतेच १९९९ सालात काँग्रेसमधून निघून स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला होता. परंतु खुद्द सोनिया गांधी यांनी शरद पवार यांचेच नाव सुचवले.
कारण शरद पवार यांच्याकडे किल्लारी भूकंप, लातूर भूकंप, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट दरम्यान सक्षमपणे परिस्थिती हाताळण्याचा अनुभव होता.
अटलबिहारी वाजपेयी यांनी एक ३५ जणांची समिती स्थापन केली. त्यात तेव्हाचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, ए.पी.जे. अब्दुल कलाम, ममता बॅनर्जी अशी अनेक मातब्बर मंडळी होती. समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान आणि उपाध्यक्ष होते शरद पवार.
देशभर दौरे आणि सर्व घटनांचा अभ्यास करून कायदा करायला भाजपचे सरकार जाऊन मनमोहन सिंग यांचे सरकार आले. २० जानेवारी २००६ रोजी अखेर NDRF ची स्थापना करण्यात आली.
NDRF दल कशारीतीने काम करते?
कायदा झाला तेव्हा दलात एकूण आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवली असून 12 बटालियनची करण्यात आली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये ११४९ अधिकारी व जवान असतात आणि त्यात काही तुकड्या बनवल्या जातात. तुकडीत ४५ जवान असतात आणि त्यामध्ये इंजिनीअर, टेक्निशियन, डॉग squad, डॉक्टर, इलेक्ट्रिशियन असतात.
याच्या महाराष्ट्र राज्यात एकूण १८ तुकड्या आहेत. मुंबईत ३, पुण्यामध्ये १४ आणि नागपूरमध्ये १ अशा १८ तुकड्यांचे विभाजन केलेले आहे.

NDRF जवानांना पूर, पर्वतरांगेतील बचावकार्य, अतिरेकी, जैविक किंवा रासायनिक हल्ल्यांच्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाते.
सावित्री नदीवरील पूल दुर्घटना, माळीण गाव दरड दुर्घटना, सांगली-कोल्हापूर येथील पूर, केरळचा पूर, असं पूर, प. बंगालमधील वादळे यात बचावकार्य करून जीवितहानी आणि वित्तहानी वाचवण्यात कष्ट घेतले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बचावकार्यात सहभागी होऊन जपानमधील २०११ सालची त्सुनामी किंवा नेपाळचा प्रलयकारी भूकंप यामध्ये मोलाची मदत केली आहे.
NDRF च्या अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत जवळपास 7 लाख नागरिकांचे जीव वाचवले आहेत.